Saturday, April 27 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुराणिकांच्या पुण्याईवर सामाजिक सुरक्षा विभागाची वसुली दुप्पट… 12 अे च्या भीकार कारवाईचा गवगवा …

चार जुगार अड्डयांवर कारवाई, प्रत्यक्षात एकाच धंदयावर कारवाईची नोंद होते….
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणतात, गुन्हेगारांमध्ये पोलीसांची दहशत आवश्यक, पंतप्रधानही म्हणताहेत- भ्रष्टाचाऱ्यांना सोडू नका, मग घोड पेंड कुठ खातय…


पुणे/दि/ प्रतिनिधी/नॅशनल फोरम/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाचे तत्कालिन वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी त्यांच्या सहा महिन्यांच्या कालावधीत जुगार, मटका अड्डा, नाईट क्लब, हुक्का पार्लर या सारख्या बेकायदेशिर व अवैध धंदयावर जबरी कारवाई करून 10 कोटींचा मुद्देमाल, 682 आरोपींसह 51 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. 10 वर्षात ज्या पोलीस अधिकाऱ्यांना करता आले नाही ते एकट्या श्री. राजेश पुराणिक यांनी अवघ्या सहा महिन्यात करून दाखविले. संपूर्ण शहरातील अवैध व बेकायदेशिर धंदे बंद झाले होते. दरम्यान एका तथाकथित व्हिडीओ आणि प्रसारमाध्यमातील तथ्यहीन बातमीच्या आधारे त्यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी श्री. कुंभार यांनी पदभार मिळविला आहे. परंतु मागील चार महिन्यात संपूर्ण पुणे शहरात जुगार अड्डयांवर लुटूपुटूची कारवाई सुरू असून, श्री. राजेश पुराणिक यांच्या पुण्याईवर संपूर्ण पुणे शहरातील अवैध धंदेवाल्यांवर कारवाईची नौटंकी न करता, सगळ्याच विभागांची वसुली दुप्पट झाली आहे. दरम्यान सामाजिक सुरक्षा विभागाने देखील 12 अे च्या भिकार कारवाईचा गवगवा करीत चार ठिकाणी कारवाई करून, प्रत्यक्षात एकाच ठिकाणी गुन्हे दाखल केले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. सामाजिक सुरक्षा विभागा प्रमाणेच इतर गुन्हे शाखांनीही मग त्यांचे दर वाढविले असल्याचे समोर आले आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणतात गुन्हेगारांवर पोलीसांची दहशत आवश्यक, परंतु पोलीस तसे वागत नाहीत मग पुढे काय करावे-
राज्यात उद्धव ठाकरे प्रणित महाविकास आघाडीचे सरकार जाऊन आता राज्यात भाजपा-शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. ज्या विचारांची सरकारे येतात, त्यांचे मर्जीतल्या अधिकाऱ्यांना मात्र क्रिमी पोस्ट आणि क्रिमी जिल्ह्यांत पदस्थापना मिळविण्यासाठी पळापळा व चढाओढ सुरू होऊ लागते. मध्यंतरी कोरोना आणि ठाकरे सरकार असल्याने त्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांनी पुण्यातील महत्वांच्या पदांवर पदस्थापना मिळविली होती. आता पोलीस अधिकाऱ्यांच्या अदला-बदलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आता सरकार बदलल्याने त्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांनी पुण्यातील महत्वांच्या पदांवर पदस्थापना मिळविली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपआयुक्त दर्जांच्या सर्वच अधिकाऱ्यांची बदली वेगवेगळ्या ठिकाणी झाली आहे. आता त्यांच्या जागी नवीन आयपीएस अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला आहे.
पुण्यात सध्या उपआयुक्त पदांवर श्री. संदीपसिंग गिल्ल, स्मार्तना पाटील, सुहेश शर्मा, शशिंकात बोराटे, विक्रांत देशमुख, अमोल झेंडे, विजय मगर, श्रीनिवास घाडगे यांनी पदभार स्वीकारला आहे. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्व उपआयुक्तांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, पुणे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारांमध्ये पालिसांची दहशत कायम असली पाहिजे. यासाठी प्रत्येक परिमंडळ उपआयुक्तांनी त्यांच्या हद्दीतील टोळ्या, भाईगिरी, दादागिरी करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याचे प्लनिंग करावे अशा सुचना पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आहेत. तसेच महिला सुरक्षितता, वाहतूक कोंडी सोडविणे, मार्शलिंग वाढविणे, हद्दीत शांतता ठेवण्यासाठी प्रत्येक पोलीस उपआयुक्त परिमंडळ प्रमुखांनी लक्ष देण्याचे त्यांनी सुचित केले आहे.

तसेच नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे शहर पोलीस सदैव कटिबद्ध असून, दादागिरी, गुंडगिरी करणाऱ्या गुन्हेगारंचे रेकॉर्ड तयार करून त्यांच्यावर कारवाई करावी, कुणाचाही मुलहिजा न ठेवता गुन्हेगारीचा बिमोड करण्यास प्राधान्य दयावे तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये महिलांनी दाखल केलेले अर्ज पेंडींग न ठेवता त्यावर तातडीने कावई करावी अशा सुचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या आहेत. 
दरम्यान देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी देखील नवी दिल्ली येथील विज्ञान भवनातील केंद्रीय दक्षता आयोगाच्या जागरूकता साप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात म्हणाले की, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या संघटनांना बचावात्मकपवित्रा घेण्याची किंवा अपराधीपणाने जगण्याची गरज नाही. आपला स्वार्थ पाहणारे त्यांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत राहतील. भ्रष्टाचाऱ्यांना सोडून नका, आक्रमक व्हा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले आहे. 

पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता आणि प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी हे सांगत असले तरी नॅशनल फोरम हे मागील 24 वर्षांपासून याचा पाठपुरावा करीत आहे. अनेक सामाजिक  राजकीय आंदोलनामध्ये सहभागी होऊन आम्ही हीच भूमिका मांडत आहोत. तथापी पुणे शहरातील पोलीस आणि इतर प्रशासकीय कार्यालये या दोन्ही सन्मानिय महोदयांच्या विचारधारे विरूद्ध सतत कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक पोलीस तर हमखास कायदा मोडत आहेत, मग पोलीस आयुक्त त्याविरूद्ध काय कारवाई करणार याच्याकडेच आमचे अधिक लक्ष आहे. 

धडकेबाज पोलीस अधिकारी श्री. राजेश पुराणिक यांचा बळी का घेतला आणि त्यांच्या बदली नंतर पुणे शहरात मागील चार महिन्यांत अवैध धंदे कसे वाढले व सुरळीत कसे सुरू आहेत त्याचेही उत्तर दया
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाचे धडाकेबाज पोलीस अधिकारी श्री. राजेश पुराणिक यांच्या कर्तृत्वाचा आलेख मोठा आहे. धडाकेबाज कारवाई करून अवैध व बेकायदेशिर धंदयावर जबरी कारवाई करण्यात आल्या. पुणे शहरातील मटका-जुगार अड्डे, जुगाराचे क्लब, ऑनलाईन लॉटरी, डर्टी नाईट लाईफ, हुक्का पार्लर, मसाज पार्लर हे सर्व अवैध धंदे गुन्हेगार, भाईगिरी व दादागिरी करणारे इसम करतात हे आता नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. याच बेकायदेशिर व अवैध धंदयातून या गुन्हेगारांना आर्थिक रसद आणि ताकद मिळत असते. श्री. राजेश पुराणिक यांनी गुन्हेगारांची ही आर्थिक रसद तोडली. त्यामुळेच पुणे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविता आले. दरम्यान श्री. पुराणिक यांच्या सारख्या कर्तबगार अधिकाऱ्यांवर तथ्यहीन व हीणकस दर्जाची कारवाई करून पुणे शहर पोलीसांचे मनोबल हे खरे तर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी तोडले आहे असे माझे मत आहे. पोलीसांचे मनोबल वरीष्ठ पोलीस अधिकारीच तोडत असतील तर पोलीसांनी गुन्हेगारीवर नियंत्रण कसे मिळवायचे हा प्रश्न अनुत्तरीच राहतो. केवळ भाषणबाजी करून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविता येत नाही. त्यामुळे श्री.पुराणिक यांची बदली का केली हे देखील समोर येण्याची आवश्यकता आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना नो… कमेंट… असे उत्तर देणे संयुक्तीक वाटत नाही. खाकीचा दरारा तर पोलीस आयुक्तांनीच कमी केला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

दरम्यान श्री. राजेश पुराणिक यांच्या तडकाफडकी बदलीनंतर पुणे शहरात पुन्हा अवैध धंदे वेगाने सुरू झाले. पुराणिक पर्वापुर्वी जेवढे अवैध धंदे होते, त्याच्यापेक्षा अधिक संख्येने अवैध व बेकायदेशिर धंदे वाढले आहेत. पूर्वी गुन्हेगारांच्या 35 टोळ्या कार्यरत होत्या. आता पुणे शहर पोलीसांच्या रेकॉर्डनुसार ती संख्या 250 च्या पुढे गेली आहे. यावरून लक्षात येते की, गुन्हेगारांना आर्थिक रसद मिळाली तर  गुन्हेगारी वाढतच जाणार आहे. श्री. पुराणिक यांच्या बदली नंतर पुणे शहरात अवैध धंदे कसे वाढले याचेही उत्तर पोलीस आयुक्तांनीच देणे योग्य होईल असे मला वाटते. 

पोलीस आयुक्त श्री.अमिताभ गुप्ता यांच्यासारखे अनेक आयपीएस अधिकारी पुण्यात येतील आणि दोन/ तीन वर्षानंतर बदलीने निघुनही जातील. परंतु पुण्यात आम्हाला कायम राहायचे आहे. आमच्या पिढ्यांना पुण्यातच रहायचे आहे. त्यामुळे आमचे प्रश्न आम्हीच रोखठोकपणे मांडणार आहोत. 
नवीन पोलीस उपआयुक्तांनी त्यांच्या त्यांच्या परिमंडळातील पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या स्वागताला सर्वसामान्य नागरीक तर कधीच जात नाही. सर्वसामान्य नागरीक पोलीस चौकीची पायरी देखील चढत नाहीत... मग मागील तीन चार दिवसांपासून पोलीस परिमंडळ कार्यालयात आलेले पुष्पगुच्छ नेमके कुणाचे आहेत याचे उत्तर  नेमकं कोण देणार ... स्वागतासाठी नेमक कोण आलेले आहेत... हे पोलीस उपआयुक्तांना सांगण्याची व समजण्याची आवश्यकता नाही. त्यांना नक्कीच माहिती आहे. 

पोलीस आयुक्तांनी पुणे शहराच्या कायदा आणि सुव्यव्यवस्थेबाबत राजकीय थाटाचे भाषण ठोकले आहे. ते किती उपआयुक्तांनी ऐकले हा प्रश्न असला तरी पोलीस आयुक्तांच्या राणाभिमादेवी थाटाच्या भाषणानुसार किती पोलीस उपआयुक्त कर्तव्य बजाविणार यावर आमचे लक्ष असेल यात शंकाच नाही. 
सर्व नवनियुक्त पोलीस उपआयुक्तांचे स्वागत करून आमच्या प्रिय पोलीस मित्र अधिकाऱ्यांचे अमृतमंथन आपल्यासाठी सादर करून या लेखासाठी तुर्तास इथेच थांबतो.....

लोकशाहीच्या अमृत महोत्सवात एव्हरीव्हेयर ॲडजस्टमेंट असतं, सज्जनाला रस्त्यातून हटवायला अहो फक्त निमित्त पुरेसं असतं…

विद्येच्या माहेरी दलालांचा बाजार, साम-दाम-दंड-भेदाचा व्यभिचार, तो मी नव्हेच म्हणत फसवायला अहो फक्त निमित्त पुरेसं असतं…

खोट्या श्रृंगाराची इथे होते बातमी, पतिव्रतेला नाही कुंकवाचीही हमी, ब्रेकींग न्यूजचे खेळात संपवायला अहो फक्त निमित्त पुरेसं असतं….

सत्ता सारीपटात लक्ष्मीची चलती, सरस्वतीला पाहून वाटच बदलली, इथं नसतं तसं दिसतं करायला… अहो फक्त निमित्त पुरेसं असतं….
शब्दर्पण समर्पयामी…. *