Thursday, April 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

काँग्रेस -राष्ट्रवादीने मराठी माणसांच्या हातात उद्योग व्यापार येऊ न देता गुजराती आणि राजस्थानी लोकांच्या हातात दिला -ॲड. बाळासाहेब आंबेडकर

Adv. Balasaheb Ambedkar
  • राज्यपालांचं वक्तव्य चुकीचं नाही, त्यांनी मराठी माणसाला जाणीव करून दिली
  • मराठ्यांनी आता ठरवले पाहीजे की, काँग्रेस- राष्ट्रवादी कॉग्रेस, भाजपा सेना या सारख्या बुजगावण्यांसोबत रहायचे की नवीन नेतृत्व तयार करायच,
  • राज्यपाल कोश्यारींचा हा टोला राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील मराठी नेत्यांना आहे.

पुणे/दि/ प्रतिनिधी/
काँग्रस-राष्ट्रवादी कॉग्रेसने राज्यावर इतकी वर्ष सत्ता गाजविली, मराठ्यांचे राज्य म्हणून कारभार केला, परंतु मराठी माणसांच्या हातात कधीच आर्थिक व्यवहार येऊ दिले नाहीत. तसेच मराठी माणसाला कधीच उद्योग व्यापार क्षेत्रात येऊ दिले नाही. ही जाणिव राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी करून दिली आहे. मराठा नेतृत्वाने आर्थिक व्यवहारात मराठीच्या हातामध्ये कधीच व्यवहार दिला नसल्याने त्यात राग येण्याचे काहीच कारण नाही. राज्यपालांनी वस्तुस्थिती मांडली आहे. त्यामुळे त्यांच्या उचलबांगडीची कोणतीही आवश्यकता नसल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी मत पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केलं आहे. आज पुण्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. भगतसिंग कोश्यारी यांच्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना बाळासाहेब आंबेडकर उत्तर देत होते.


ॲड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, राज्यपालांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचा अपमान झालेला नाही. राज्यात दोघेजण वक्तव्य करतात. एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरे राज्यापाल कोश्यारी. यातील फडणवीस यांचे कोणतही वक्तव्य हे स्वत:साठी असते त्यामुळे पक्षासाठी कुणी वक्तव्य करणारं असं महाराष्ट्रात उरलेलं नाही. त्यामुळे ती भूमिका राज्यपाल करत आहेत, असं म्हणत त्यांनी राज्यपालांचे समर्थन आणि फडणवीसांचे कान टोचले आहेत.
विरोधकांकडून होणाऱ्या प्रतिक्रिया संदर्भात विचारले असता आंबेडकर म्हणाले, राज्यापालांची उचलबांगडी कशासाठी? त्यांनी हे वक्तव्य करुन मराठी माणसाला इशारा दिला आहे. येथील व्यापार हा राजस्थानी आणि गुजराती लोकांच्या हाती आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला झाला आहे. कारण इतकी वर्ष राज्य आणि सत्ता असूनही त्यांनी मराठी माणसाच्या हाती आर्थिक व्यवहार न देता ते राजस्थानी आणि गुजराती लोकांकडे दिले. त्यामुळे राज्यपालांनी याची जाणीव करुन दिली आहे.
त्यामुळे मराठ्यांनी आता ठरवले पाहीजे की, काँग्रेस- राष्ट्रवादी कॉग्रेस, भाजपा सेना या सारख्या बुजगावण्यांसोबत रहायचे की नवीन नेतृत्व तयार करायच, असंही बाळासाहेब आंबेडकर यांनी सुचवलं आहे.
राज्यपाल कोश्यारींचा हा टोला राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील मराठी नेत्यांना आहे. तुम्ही इतकी वर्ष राज्य करुनही मराठी लोकांच्या हाती व्यवहार येऊ दिलेले नाहीत. आजही हे व्यापार गुजराती आणि राजस्थानी लोकांच्या हाती आहे.
या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा कोणताही अपमान झालेला नाही. कारण राज्यपाल कोश्यारींनी सत्य परिस्थिती मांडली आहे, असंही बाळासाहेब आंबडेकर यांनी स्पष्ट केलं आहे.