Thursday, May 2 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

वंचितच्या जाहीरनाम्यात तृतीयपंथीय-समलैंगिक व्यक्तीस मोफत उच्च शिक्षणासह, परदेशात शिक्षणासाठी स्कॉलरशिप, घरकुल योजनेतही तरतुद

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
तृतीयपंथी समाज, जोगती, आराधी या समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन दुषित आहे. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारच्या संधी मिळत नाहीत. शासनस्तरावरून देखील कोणत्याही तरतुदी केल्या जात नाहीत. तत्कालिन काँग्रेस राजवटीत तर ट्रान्सजेंड अर्थात तृतीयपंथीयांना दिल्लीत जबरी मारहाणीच्या घटना अनेकदा घडल्या होत्या. आज भाजप देखील काँग्रेसचाच कित्ता गिरवित आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडी मात्र कायम तृतीयपंथी, जोगती, आराधी या समाज घटनांना, मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करीत होता. लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या कार्यकाळात त्यांनी किमान समान कार्यक्रम तयार करून महाविकास आघाडीकडे पाठविला आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीने तयार केलेल्या 39 कलमी किमान समान कार्यक्रमात मुद्दा क्र. 31 वर तृतीयपंथी समाज घटकांना, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तरतुद केली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यातील मुद्दा क्रमांक 31 वर तृतीयपंथी (पारलिंगी) यांना शासनाने कायदा करून 1 टक्का समांतर आरक्षण देत त्यांना नोकरी, रोजगार (व्यवसाय) व कल्याणकारी योजनांमध्ये सहभाग मिळवुन देणे ही अतिशय ऐतिहासिक व धाडसी तरतुद केली आहे. तसेच मविआमच्या धर्तीवर तृतीयपंथीस समाजासाठी विशेष आराखडा व बजेट मधे प्रावधान/ तरतुदी करण्याबाबत सुतोवाच केले आहे. 
 तृतीयपंथी समलैगिक व्यक्तीस माध्यमिक ते उच्च व  तंत्र शिक्षण मोफत देण्याची तरतुद मुद्दा क्र. 31 वर करण्यात आली असून, त्यांना परदेशात/विदेश शिक्षणासाठी त्यांच्या प्रवार्गानुसार विशेष शिष्यवृती (स्कॉलरशिप) द्यावी, तसेच तृतीयपंथीयांना शासनाच्या घरकुल निवास व्यवस्थेसाठी विशेष महिला म्हणून योजना राबविणे ही देखील तरतुद वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यात तरतुद केली आहे. 

दुभंगलेली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व शिवसेना (उबाठा) यांनी एकत्र येवून महाविकास आघाडी स्थापन केली आहे. दरम्यान देशातून भाजपा व मोदींना सत्तेतून बाहेर करण्यासाठी वंचितने महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय केला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीने एक किमान समान कार्यक्रम तयार केला आहे. तो 39 कलमी कार्यक्रम महाविकास आघाडीतील घटक पक्षांना पाठविला आहे. परंतु आज 13 दिवस झाले तरी त्या पक्षांनी या जाहीरनाम्यात आणखी भर घालुन हा जाहीरनामा परिपूर्ण करण्याबाबत कळविले आहे. परंतु दुभंगलेली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व शिवसेना (उबाठा) यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. परंतु मुळात जनता याच प्रस्थापित पक्षांना कंटाळली असून, आता बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी सोबत आली आहे. वंचित सत्तेवर आल्यानंतर, त्यांचा 39 कलमी जाहीरनामा राबविण्यावर भर देणार असल्याचे वंचितकडून जाहीर केले आहे.