Friday, April 26 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

समर्थ वाहतुक विभागाच्या पुराणिक दुष्कृत्यामुळे, पुणे शहर पोलीस दलाच्या प्रतिमेला डांबराचा लेप

अहो दाजीबा, गावात होईल शोभा हे वागणं बरं नव्हं
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
पुण्यात कोरोना महामारी संसर्गाचा प्रादुर्भाव मोठा असून, त्याच्या संहारिक कृत्यामुळे शेकडोंचे जीव गेले आहेत. राज्यातील ठाकरे सरकारने लॉकडाऊन घोषित केले आहे. मुलभूत नागरी व अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्या क्षेत्रात शुकशुकाट आहे. हॉटेल, रेस्टॉरंट,बार, प्रवासी वाहतुकीसारखे आवश्यक परंतु दुय्यम दर्जाचे व्यवसाय बंद झाले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांची रोजी बंद झाली असली, तरी समर्थ वाहतुक पोलीसांना मात्र लॉकडाऊनचा धक्का बसला आहे. प्रवासी व मालवाहतुक बंद आहे, हॉटेल रेस्टॉरंट-बार सारखी आस्थापना बंद असल्यामुळे सगळ्याच प्रकारचे चलन वलन बंद झाले असल्यामुळे बेभान झालेल्या समर्थ वाहतुक शाखेने आता आपला मोर्चा सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घालण्याचे सत्र सुरू केले आहे. थोडक्यात एखादया दारूड्याला दारू मिळाली नाही तर घरातील वापराची भांडी देखील बाजारात विकुन दारू खरेदी करतो अगदी त्याच्या हुबेहूब कृत्य समर्थ वाहतुक पोलीसांनी केले आहे. घटनादत्त मिळालेल्या अधिकारांचा वापर करून सर्वसामान्यांना लुटून आपले टार्गेट पूर्ण केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या समर्थ वाहतुक पोलीस विभागाच्या दुष्कृत्यांची बातमी ड्राफ्ट करतांना देखील मनाला लज्जा उत्पन्न व्हावी अशा प्रकारचे क्रुरकृत्य वाहतुक पोलीसांनी केले आहे. त्याचे प्रमुख कप्तान पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक असून, त्यांच्या दरदिवशीच्या नव नवीन कहाण्या ऐकुन मला प्लेग च्या साथीची आठवण झाली. 
सन १९८० वा ८२ साली मी तिसरी चौथीत असतांना इतिहासाच्या पुस्तकात वाचण्यात आले होते की, पुण्यात प्लेग साथ आल्यानंतर, ब्रिटीश मंडळी घराची साफसफाई करण्याच्या बहाण्याने घरातील आवश्यक व मौल्यवान चिजवस्तु देखील लंपास करीत असल्याचे वाचण्यात आले होते. आज ४० वर्षांनंतर आठवण आणि प्रत्यक्षातील अनुभव घेत आहे. आज पुण्यातही कोरोना संसर्ग वाढल्यामुळे पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊन मधील मास्क आणि इतर कारवाईवाच्या बहाण्याने सर्वसामान्यांच्या खिशावर दारोडा घालण्याचे काम समर्थ वाहतुक पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी केले आहे. 

गाड्यांना अडविणे आणि पैसे वसुल करणे –
राज्य शासनाने लॉकडाऊन बाबत काढण्यात आलेल्या आदेशात बांधकाम क्षेत्राबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. कामगारांची काळजी घेण्यात आल्यास, बांधकामांना कुठल्याही प्रकारचे बंधन लादण्यात आले नाही. मागील १५ दिवसांपूर्वी बांधकामाचा राडारोडा वाहून घेवून जाणार्‍या एका ट्रक चालकाला अडवुन, त्याच्याकडून सुमारे ३० हजार रुपये घेतल्याचा प्रकार घडला आहे. याबाबतच्या तक्रारी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आलेल्या आहेत. तथापी यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे समजते.
पुणे शहरात सध्या मेट्रोच काम वेगात सुरू आहे. स्वतः पालकमंत्री कामांचा आढावा घेवून कामे वेळेत पूर्ण करण्याच्या मार्गात आहेत. मध्यंतरी मेट्रोच्या कामावर असलेल्या रेडीमेड मिक्स कॉंक्रीटच्या गाड्या समर्थ हद्दीतून जात असतांना, त्या गाडी देखील श्री. पुराणिक यांनी अडविल्या होत्या. त्यांच्याकडे देखील पैशांची मागणी करण्यात आली होती. तथापी पैसे देत नाहीत म्हटल्यावर, श्री पुराणिक यांनी गाडीवर दंड, वाहनमालक, वाहन चालक, गाडीची कागदपत्रे, पीयुसी, वाहन चालकाचे लायसन्स या सारखी कागदपत्रे असल्याशिवाय गाड्या सोडणार नाहीत, अशी दमबाजी केली. शेवटी याबाबत स्वतः पालकमंत्र्यांनी श्री. पुराणिक यांना समज देवून देखीत त्यांनी त्यांचा हेका सोडला नाही.
पुण्यातील नवीन जिल्हा परिषदेजवळ कोरोना वॅक्सीनसाठी असलेल्या ऍम्बुलन्स चालकाला देखील दमबाजी करून, त्याच्याकडून रस्त्यात वाहन का पार्क केले म्हणून त्यांच्याकडून देखील विनापरवाना वाहन पार्क केल्याबद्दल शासकीय वाहनावर दंड आकारण्यात आला आहे. ६ दिवस संबंधित वाहन एका जागेवर थांबविले होते.
हा तर खुलेआम दरोडाच –
पदाचा आणि अधिकारांचा गैरवापराचे अव्वल दर्जाचे नमुने पहा –
समर्थ वाहतुक विभाग शाखेत पोलीस निरीक्षक (सशस्त्र) श्री. राजेश पुराणिक हे कर्तव्यावर हजर असतांना, आपल्या पदाचा दुरूपयोग करून, सर्वसामान्य नागरीक, व्यापारी तसेच किरकोळ दुकानदार, किरकोळ विक्री करणारे नागरीकांना त्रास देवून त्यांचेकडून जबरीने चिजवस्तु उचलुन नेत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. शासनाने त्यांना देणेत आलेल्या अधिकाराचा गैरवापर करून, पोलीस खात्याची नाहक बदनामी होईल असे गैरकृत्य श्री. पुराणिक करीत असल्याचेही अनेकदा माझेसहित अनेकांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे श्री. राजेश पुराणिक यांची खातेनिहाय व विभागीय चौकशी करून त्यांचेविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी होत आहे.
समर्थ वाहतुक विभाग पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असल्यामुळे शहराच्या कोणत्याही भागातून ये व जा करीत असतांना, समर्थ वाहतुक विभागाच्या हद्दीतून प्रवास करावा लागतो. मध्यवर्ती पुणे शहरात समर्थ वाहतुक विभाग असल्यामुळे त्या विभागाला अनन्य साधारण महत्व आहे. परंतु याच समर्थ वाहतुक विभागात आरटीओ पुणे कार्यालयाने वाहतुकीच्या अडथळे होत असल्यामुळे कोणत्याही प्रकारची प्रवासी व मालवाहू मोठी वाहने थांबविण्यास, पार्कींग करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
तथापी समर्थ वाहतुक विभागाच्या संगनमतामुळे आरटीओची कोणत्याही प्रकारची मान्यता नसतांना देखील वाहनतळासारखा जागेचा वापर करण्यात येत आहे. जागेवर अनेक प्रकारची छोटी मोठी ५० ते ६० प्रवासी वाहने, वाहनतळ असल्यासारखे पार्कींग केल्या जात आहेत. तसेच अनेक प्रकारची मालवाहतुक वाहने देखील मोठ्या संख्येने या हद्दीत थांबविले जाते. पार्कींग केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता, श्री. राजेश पुराणिक हे प्रवासी वाहने व मालवाहतुक वाहनांकडून मोठ्या लाचेची रक्कम स्वीकारत असल्याचे काहींचे मत आहे. दरमहा मोठी रक्कम श्री. पुराणिक यांना दिली जात आहे. तसेच प्रवासी व मालवाहतुक वाहनांवर कारवाई करू नये यासाठी देखील मोठी रक्कम दिली जात आहे.
मोठ्या लोकांकडून, मोठ्या भांडवलदारांकडून हप्ते घेतले जात असतील त्याबाबत कुणाचेही काहीच दुमत नाही. परंतु किरकोळ टेम्पोचालक, किरकोळ दुकानदार, हातगाडीवर आंबे, केळी सारखे फळे फळावर विकणार्‍या नागरीकांकडून देखील सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात त्यांचे गाडीवरचे, टेम्पोमध्ये थांबुन विक्री करीत असतांना, त्यांचे टेम्पोमधुन चांगल्या दर्जाचे आंबे, केळी व इतर फळफळावर देखील श्री. पुराणिक यांचेकडून जबरीने हात मारला जात आहे.
आंबे, केळी किंवा इतर फळ विक्रेत्यांना आजच्या लॉकडाऊनच्या काळात विक्रीतून मोजके पैसे मिळतात. पोटाच्या गरजा भागविण्याइतपत त्यांना व्यवसायातून किरकोळ रक्कम मिळत आहे. त्यांच्याकडून पैसे मिळाले नाहीत म्हणून थेट त्यांचे आंबे, केळी व इतर फळे, मालकाच्या परवानगीविना, जबरीने उचलुन नेले जात आहे. ही भयंकर लाजिरवाणी बाब असून, पोलीस खात्याला कलंक लावणारी आहे.
माझ्या २५ वर्षाच्या बातमीदारीच्या काळात असे प्रकारच क्वचित कुठे घडले असतील, परंतु एवढे जबरी आणि गलिच्छ प्रकारचे गैरकृत्य आजपर्यंत पाहीले नाही. त्यांना पगाराव्यतिरिक्त इतर अपसंपदा जमा करण्याचा छंद जडला आहे. इतर वेळी त्यांच्या गैरकृत्यांकडे कुणी लक्ष दिले नसते. परंतु सध्या उद्योगधंदे बंद आहेत. सगळीकडे लॉकडाऊन आहे. हे श्री. पुराणिकांच्या लक्षातच यायला तयार नाहीये. त्यामुळे त्यांची मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासणी होणे आवश्यक आहे. दरम्यान पुराणिकांच्या या गैरकृत्यामुळे पुणे शहर पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत आहे.
भांबावलेले व गलितगात्र पुराणिक
पुण्यात लॉकडाऊन आहे. सगळे उद्योग बंद आहेत. त्यात बाहेरची वसुली बंद असल्याने श्री. पुराणिक हे भांबावलेले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाट्टेल तिथं हात मारण्याचे काम श्री. पुराणिक करीत आहेत. मागील दोन महिन्यापूर्वी तर समर्थ पोलीस स्टेशन मधील एका पोलीस कर्मचार्‍याचे वाहन जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. समर्थ वाहतुक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांचे वर्तन हे जाणिवपूर्वक असून, जाणुनबुजून पुणे शहर पोलीस दलाची बदनामी करण्याच्या उद्देशाने त्यांचे गैरकृत्य व वर्तन सुरू असते.
जा.. जा.. माझी बातमी टाका, असे अरेरावीपणे सांगत आहेत. याचा निश्‍चित अर्थ, बातमीतुन पुणे शहर पोलीसांची प्रतिमा मलिन होणार आहे, पुराणिकांवर होवून झाली तरी काय कारवाई होणार… परंतु पुणे शहर पोलीसांची दुप्पट वेगाने बदनामी तर होणारच आहे ना… अशी अटकळ श्री. पुराणिक यांनी बांधली असल्याचे तरी दिसून येत आहे.