Friday, March 29 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

१० रूपयांच्या भोजनावर अटी व शर्थींची मात्रा

मुंबई/दि/
१० रुपयात थाळी योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. राज्यातील गोरगरीब जनतेसाठी १० रुपयात भोजन उपलब्ध करुन देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यासाठी तीन महिन्यांमध्ये ६ कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसंच या थाळीमध्ये २ चपात्या, १ वाटी भाजी, १ मूद भात आणि १ वाटी वरण देण्यात येणार आहे.
परंतु ही थाळी खाण्यासाठी काही अटी शर्थींचं पालनही करावं लागणार आहे. या भोजनावर अटी व शर्थींची मात्रा लागू झाल्याने गोरगरीब जनतेने महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या नावाने खडे फोडले आहेत. दरम्यान, १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात केवळ १८ हजार थाळ्या मिळणार आहेत. तर मुंबई आणि मुंबई उपनगराला मिळून १९५० थाळ्या मिळणार आहेत.
काय आहेत अटी शर्थी ?
हे भोजनालय वर्दळीच्या ठिकाणी असणार असून भोजनालयं केवळ दुपारी १२ ते २ या कालावधीतच कार्यरत राहणार आहेत. सदर भोजनालयात दुपारी १२ ते २ या कालावधीत या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित भोजनालय चालकाची असेल. यासाठी भोजनालय चालवण्यासाठी सदर मालकाकडे स्वत:ची पर्याप्त जागा असावी.
सदर भोजनालयात बाहेरचे जेवण घेऊन येण्यास आणि भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई असेल. भोजनालयात एका वेळी किमान २५ व्यक्तींची जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असेल. एका भोजनालयात किमान ७५ आणि कमाल १५० थाळी भोजन उपलब्ध होईल.
यासंदर्भात राज्य शासनानं एक जीआर काढला आहे. सध्या राज्यभरात प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्यात येणार आहे. तसंच शहरी भागांमध्ये प्रतिथाळी ५० रूपये तर ग्रामीण भागांमध्ये प्रतिथाळी ३५ रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. शहरी भागांमध्ये २ चपात्यांसाठी १० रूपये, १ वाटी भाजीसाठी २० रूपये, १ वाटी वरणासाठी १० रूपये आणि १ मूद भातासाठी १० रूपये असे एकूण ५० रूपये ठरवण्यात आले आहेत. परंतु ग्रामीण भागात पुरवण्यात येणार्या थाळीबद्दल मात्र कोणतीही माहिती देण्यात आली नाही.