Sunday, May 5 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे पोलीसांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान डॉ. आनंद तेलतुंबडेंची अटक बेकायदा, विशेष न्यायालयाचा पुणे पोलीसांवर आसुड

Dr-Teltumbade

पुणे/दि/ प्रतिनिधी/

           भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि कथित नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी डॉ. आनंद तेलतुंबडे यांना मुंबई विमानतळावर उतरताच पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर, पुणे पोलिसांनी तेलतुंबडेंना पुण्याला आणले. आज न्यायालयात हजर करून त्यांच्या कोठडीची मागणी करण्यात येत होती. मात्र, येथील विशेष न्यायालयाने ही अटक बेकायदा असून, सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी असल्याचं म्हटलंय. दरम्यान पुण्यातील सत्र न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र, ही अटक बेकायदा असल्याचं विशेष न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुणे पोलिसांच्या कारवाईला रट्टा बसलाय.

          पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर कथित नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी संशावरून कारवाई केली होती. मात्र ’मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालेलो नाही आणि कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा काहीही संबंध नाही’, असा दावा करत आनंद तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांच्यावरील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.

          डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकेवर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला. त्यांच्या बाजूने रोहन नहार यांनी युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयाने तेलतुंबडे यांना ४ आठवड्यांचे संरक्षण दिले असताना, ही अटक म्हणजे न्यायालाचा अवमान आहे, असे विशेष न्यायालयाने म्हटले आहे. तसेच हे संरक्षण ११ फेब्रुवारीपर्यंत कायम असल्याचेही न्यायलयाने स्पष्ट केले.

          जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी यास विरोध केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ४ आठवड्यात योग्य न्यायालयात जाऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करता येत होता. ज्यादिवशी त्यांनी हा अर्ज केला तेव्हाच, हे संरक्षण संपले.

           हा अर्ज फेटाळल्याने पोलिसांना अटक करता आली. त्यांनी अर्ज केला नसता तर पोलिसांनीही अटक केली नसती, असा युक्तिवाद उज्ज्वला पवार यांनी केला. परंतु, विशेष न्यायालयाने तेलतुंबडे यांची अटक बेकायदा ठरवली आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.