Thursday, May 2 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

मिठानगर कोंढवा येथील पथारी व्यावसायिकांचे कचरा डेपोलगत स्थलांतरास तीव्र विरोध , पीएमपीएमएलचा बस डेपोची मागणी

पुणे/दि/ प्रतिनिधी/
कोंढवा खुर्द मिठानगर रस्त्यावरील पथारी व्यावसायिकांचे स्थलांतर पारगेनगर कोंढवा पोलीस स्टेशनसमोरील कचरा डेपोलगत करण्याचा काहींचा दृष्ट डाव आहे. व्यावसायिकांच्या व नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कचरा डेपोलगत पथारी व्यावसायिकांचे स्थलांतर करून त्यांच्या आरोग्याशी खेळ ठरू शकतो. त्यामुळे स्थलांतरास पथारी व्यावसायिक व नागरकांनी तीव्र विरोध सुरू केला असल्याची माहिती असंघटीत सह्याद्री चालक मालक वाहतुक सेवा संघाचे अध्यक्ष ऍड. नझीर तांबोळी यांनी सांगितले आहे.


कोंढवा खुर्द मिठानगर रस्त्यावरच नागरीकांची वर्दळ असते. निदान नागरीकांच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर असल्यामुळे व्यवसाय होत आहे. उद्या यांचे स्थलांतर झाले तर गिर्‍हाईक येतील की नाही याची कोणतीही शाश्‍वती नाही. पथारी व्यावसायिकांसाठी केंद्र शासनाने चांगल्या योजना राबविल्या असतांना, पथारी व्यावसायिकांच्या पोटावर लाथ मारण्याचे काम काही विघ्नसंतोषी लोक करीत असल्याचा आरोप पथारी व्यावसायिकांनी केला आहे.
दरम्यान पारगेनगर कोंढवा पोलीस स्टेशन समोरील जागेत पीएमपीएमएल चा बस डेपो जंक्शनची मागणी होत आहे. हा डेपो फायदेशिर ठरणार असून, कोंढवा बस डेपोवरून मार्गिक क्र. १) सिंहगड रोड, नारायणपुर, सासवड बालाजी मंदिर २) कोंढवा – स्वारगेट ३) कोंढवा – हडपसर ४) कात्रज व्हाय कोंढवा ५) नारायणपुर, सासवड बालाजी मंदिर ६) खेड शिवापूर – कमरअली दुर्वेश दर्गा ७) वारजे, माळवाडी, कात्रज, आंबेगाव, जांभूळवाडी, नांदेड फाटा, एनडीए ८) कोंढवा ते सय्यदनगर, व्हाय एनआयबीएम रोड, महमंदवाडी शटल सर्व्हीसेस फायदयात चालणारे होती. यामुळे पीएमपीएमएल ला फायदाच होणार आहे यात शंकाच नसल्याचे मत ऍड. नझिर तांबोळी यांनी व्यक्त केले आहे. ऍड. तांबोळी यांनी याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त व पीएमपीएमएल कडे सादर केले आहे.


स्थलांतर नेमके कुणाच्या फायद्याचे –


दरम्यान कोंढव्यातील काही नगरसेवकांनी भाजी मंडई स्थलांतराचा मुद्दा उपस्थित केला आहे. तथापी याबाबत पुणे महापालिका यांची कोणतीही योजना व तरतुद नसल्याचे आम्हाला ज्ञात आहे. कोंढवा पोलीस स्टेशन समोरील कचरा डेपोलगत पथारी व्यावसायिकांचे स्थलांतर करून, त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्‍न अधिक चिघळू शकतो.
आज कोरोनामुळे सर्वांचे व्यवसाय डबघाईला आले आहेत. त्यात पथारी व्यावसायिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम काही विघ्नसंतोषी लोक करीत असून, पथारी व्यावसायिकांच्या पोटावर लाथ मारणार्‍यांना आता दूर केले पाहिजे असे मत ऍड. नझिर तांबोळी यांनी व्यक्त केले आहे.