Friday, March 29 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

महाराष्ट्रातील सत्तेची लंगडीपानी… राजकारण घाला चुलीत…

महाराष्ट्रात सध्या सत्तेची लंगडीपानी सुरू आहे. सत्तेची आंधळी कोशिंबीर सुरू आहे. आमदारांना पोरींसारखं इकडुन तिकडं हॉटेलात पाठवलं जात आहे. कधी कोण पळुन जाईल आणि दुसर्‍याबरोबर निकाह करतील ह्याचा काही भरवसा देता येत नसल्याने सर्वजण आमदारांवर लग्नाच्या पोरीसारखं लक्ष देवून आहेत.
तिकडं अजितरावांनी मी राष्ट्रवादीतच आहे, नव्हे ती राष्ट्रवादी कॉंग्रेस आहे अस्सं दणकुण सांगितलं आहे. कधी कधी अस्सं वाटतय की, ही खेळी शरद पवार यांची तर नाहीये ना… पण काहीच उत्तर मिळत नाहीये… सध्या राज्यात काही ठिकाणी ओला दुष्काळ पडला आहे तर काही ठिकाणी कोरडा दुष्काळ आहे. शेतकर्‍यांच्या हातातुन पिक निघुन गेले आहे. तिकडे बाजारात भाज्यांसहीत कडधान्याचे भाव वाढत आहेत. व्यापारी साठा करण्याच्या तयारीत आहेत. पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष नेमकं कुठं चाललयं हेच समजत नाहीये. पुण्यातील बाजारपेठांमध्ये धान्याची आवक होत आहे, परंतु तेवढे धान्य बाहेर जात नसल्याचे काहींनी सांगितले आहे. विशेषतः डाळींची साठवणूक केली जात असल्याची माहिती आहे. महागाई वाढण्याची शक्यता आहे. काही किराणा बाजाराचे दर वाढले आहेत. त्यामुळे एकीकडे शेतकरी मरत आहे तर तिकडे व्यापारी साठवणूक करून सर्वसामान्यांना ठार करण्याच्या तयारीत आहे.
राज्यात राजकारण जोरात सुरू आहे. सध्या त्याकडे आम्ही साफ दुर्लक्ष केले आहे. अजित पवार किंवा शरद पवार किंवा सर्वच राजकीय पक्षांना जो काही धिंगाणा घालायचा आहे तो घालुद्यात… आज नाही तर उद्या ते दमून जातील. परंतु वाढलेल्या महागाईवर नंतर नियंत्रण कोण ठेवणार… सध्या मोठ्या मिडीयावाले मोठ्या बातम्यांकडे लक्ष देत आहेत. आम्ही मात्र सध्या राज्यातील राजकारणावर भाष्य करणार नाहीहोत. परंतु जे काही चाललं आहे ते राज्यातील जनतेची दिशाभुल करण्यासाठी खेळ सुरू आहे एवढे मात्र नक्की.. पवारांच काय होणारेय… राष्ट्रवादीचं काय होणारेय… शिवसेनेचा पोपट झालाय…. किंवा आय कॉंग्रेस मध्येच लोंबकळत पडली आहे. ह्या सार्‍या भानगडीत जनतेचे विषय कुठे आहेत… बस्सं नको त्या चर्चा…. सर्वसामान्यांनी आपआपल्या प्रश्‍नांकडेच जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. राजकारण चुलीत घाला… सोडा ते फेसबुक आणि व्हॉटसऍप… आणि निघा कामाला….