Sunday, April 28 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

खेकड्यानं धरण फोडलं, ही तर बौद्धिक दिवाळखोरी-विजय पांढरे

tiware dam

पुणे/दि/

       रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या ‘खेकडा’ वक्तव्यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूंनी जोरदार टीका सुरू झालीय.जलसंधारण विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता विजय पांढरेंनी जलसंधारण मंत्र्यांचं ‘खेकडा’ वक्तव्य म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी असल्याचं म्हटलंय.

       मोठ्याप्रमाणावर खेकड्यांनी तिवरे धरणं पोखरल्यामुळं ते फुटल्याची प्रतिक्रिया जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिली होती. त्यावर विजय पांढरेंनी सावंत यांचं ते वक्तव्य अतिशय हास्यास्पद असून याला केवळ बौद्धिक दिवाळखोरीच म्हटलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिलीय.

       तिवरे धरणाचा जो बेस आहे तो जवळपास आठशे ते हजार फूट रुंद आहे. खेकडा साधारणतः तीन ते चार फूट पोखरू शकतो आणि त्यामुळे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केलेलं वक्तव्य अतिशय चुकीच आहे. कोणताही शास्त्रीय किंवा तांत्रिक आधार सावंत यांच्या वक्तव्याला नाही. केवळ आणि केवळ बौद्धिक दिवाळखोरीचंच हे लक्षण असल्याचं पांढरे म्हणाले.

       अधिकारी आणि कंत्राटदार यांना पाठीशी घालण्यासाठी हे विधान तानाजी सावंत यांनी केलं असावं असं मत पांढरे यांनी व्यक्त केलंय. खेकड्यांनी जर धरणं फोडली असती तर महाराष्ट्रात छोटे-मोठे जवळपास चाळीस हजार प्रकल्प आहेत मग तिथे खेकडे नाहीत का ? खेकड्यांमुळे जर या धरणाला धोका असता तर सर्वच धरण फुटले असते. त्यामुळे तानाजी सावंत यांनी शिवसेनेच्या कंत्राटदार- आमदारांची पाठराखण करू नये असा सल्ला पांढरे यांनी दिलाय.