Saturday, April 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे शहरातील उपनगरापाठोपाठ मध्यवर्ती शहरातील लष्करसह शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत कोयता गँगचा धुडगूस

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे काय, कायदयाचा आणि पोलीसांचा धाक कुठे नाहीसा झाला या विषयावर मागील तीन आठवड्यांपासून गुन्ह्यांच्या घटना आणि कोयता खोरांच्या दहशतीच्या अनुषंगाने नॅशनल फोरमध्ये प्रश्नमालिका सुरू असतांनाच आज लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतही अल्पवयीन मुलांनी दिवसाढवळ्या हातात कोयता घेवून दहशत माजविली आहे. तत्कालिन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी मोक्का आणि एमपीडीए मध्ये प्रत्येकी शतक गाठल्याचा गवगवा केला, परंतु त्याचे उलट परिणाम तर होत नाहीयेत ना ही देखील आज तपासून पाहण्याची वेळ आली आहे. मोक्का, एमपीडीए आणि तडीपारीची होऊन होऊन दोन तीन वर्षे शिक्षा होईल. परंतु आपणही भाई होणार या विषारी अमिषातून तर हे कृत्य पुणे शहरात होत नाहीयेत ना याचीही मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासणी होणे आवश्यक आहे. दरम्यान कायदयाला आणि पोलीसांना आव्हान देणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे यात काहीच वाद नाहीये. परंतु 32 पोलीस स्टेशन हद्दीत हा प्रकार होत राहिला तर, पोलीसांचा आहे तेवढाही धाक संपुष्टात येईल. भारतीच्या पोलीसांनी भर रस्त्यात जसे ठोककाम केले, त्याच प्रकारचे ठोककाम लष्करमध्ये होणे अपेक्षित होते. मानवाधिकार वाल्यांच्या प्रश्नांना काय उत्तरे दयायची ती नंतर पाहू… परंतु आज पुण्याची कायदा आणि सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे अशी भावना व्यक्त होत आहे.

लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत भरदिवसा घुडगूस-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी मोनिष शशिकांत म्हेत्रे (वय-39 रा. भवानी पेठ, पुणे) यांचे भवानी पेठेत हॉटेल आहे. गुरुवारी दुपारी ते आणि त्यांचे कामगार हॉटेलमध्ये काम करत होते. हॉटेलमध्ये गर्दी असल्याने ते हॉटेल समोरील पार्किंगमध्ये बसले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास दुचाकीवरुन पाच ते सहा तरुण तोंडाला रुमाल बांधून तिथे आले. त्यांच्या हातात कोयता, हॉकी स्टिक आणि लोखंडी रॉड होते. फिर्यादी त्यांना काउंटरवर दिसले नसल्याने ते परत फिर्यादी थांबलेल्या ठिकाणी आले.आरोपींनी त्यांच्याकडे पाहून शिवीगाळ केली. त्यानंतर दोन तीन जण हॉटेलमध्ये गेले.त्यांनी आतमध्ये तोडफोड केली.
यानंतर बाहेर ठेवलेल्या खुर्च्यांवर कोयते मारुन तोडफोड केली. हा सर्व प्रकार हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेनंतर फिर्यादी यांनी लष्कर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सहा जणांवर भादवी 352, 504, 427, 143, 147, 148, आर्म ॲक्ट, मुंबई पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील जंगली महाराज खाऊ गल्लीत राडा-
शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील जंगली महाराज खाऊ गल्लीत टोळ्याने दशहत माजवत राडा घातला. खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या महिलेवर कोयते उगारून त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकणी शिवाजीनगर पोलीसांनी सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आयुष गायकवाड याच्यासह सहा साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान कॅम्प व जेएम रोडवरील कोयताखोरांनी ज्या प्रकारचा धुडगूस घातला, कायदयाला आव्हान देणारे जे कृत्य केले, त्यावर शिवाजीनगर व लष्कर पोलीसांनी भर दिवसा घडत असलेल्या क्रौर्याविरूद्ध स्वतःकडील दांडपट्टा भिरकाविणे आवश्यक होते. तथापी भारतीच्या पोलीसांनी जे शौर्य दाखवलं, ते धाडस शिवाजीनगर, लष्करच्या पोलीसांना का दाखविता आले नाही…?
भारतीच्या पोलीसांनी सिंहगड हद्दीत घुसून कोयतेखोरांना भररस्त्यात रंगवल, शिवाजीनगर, कॅम्पमध्ये कोयतेखोरांचे कौर्य सुरू असतांना, शिवाजीनगर व लष्कर पोलीस हाताला मेहंदी लावुन बसले होते..? काय असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

अल्पवयीन मुले आणि संरक्षण, मानवाधिकार, कायदयातील किचकट तरतुदी,न्यायालयीन प्रकरणे या कागदी घोडयांची दशहत पोलीसांनी मनावर न घेता, पोलीस खात्याला दिलेल्या सर्वच शस्त्रांचा  वापर पुरेपुर करणे आवश्यक ठरत आहे. नाहीतर उदया रस्त्यावरून पोलीत जात असतांना त्यांच्या अंगावर देखील कुणी कोयता उगारला किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या पोलीस वाहनांवर जर कुणी कोयता मारला तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे पोलीसांचा धाक असणे कादयाच्या दृष्टीने आवश्यक आहे.
 निदान अल्पवयीनांवर कारवाई करता आली नाही तर त्यांच्या पालकांना आणि संपूर्ण कुटूंबियांना पोलीस स्टेशन मध्ये बोलावुन घेवून त्यांचे पोलीसी भाषेत समुपदेशन करणे आवश्यक आहे. समुपदेशनासाठी 48 तास ठेवले तरी त्याला कायदयाची मान्यता असेल यात शंकाच नाही. पुणे पोलीसांना सर्वोत्तम पर्याय शोधावे लागणार यात शंकाच नाही.