Wednesday, April 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

गरीब मराठ्यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे! ऍड. आंबेडकर

जोपर्यंत गरीब मराठा श्रीमंत मराठ्यांच्या पोटात आहे तोपर्यंत त्याच्यात वेगळेपण दिसणारच नाही. आतापर्यंत गरीब मराठा जातीसाठी माती खात राहिला पण, दुर्दैव ज्या गररीब मराठयाने श्रीमंत मराठ्याला सत्तेत बसवलं त्याने गरीब मराठ्याकडे पाठ फिरवली आहे. वंचित बहुजन आघाडी गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे अशीच भूमिका सुरुवातीपासून मांडत आली आहे. ऍड. बाळासाहेब आंबेडकर

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या विरोधात निकाल दिला आणि असा निर्णय कायद्याचे जे जाणकार आहेत त्यांच्यासाठी नवीन नाही. दुर्दैव हे आहे की, मराठा समाज नेहमीच आणि त्यापैकीच श्रीमंत मराठा, हा आपल्या संख्येच्या आणि मनगटाच्या जोरावर आपण सर्वकाही मिळवू शकतो अशी त्याची मानसिकता आहे. संख्येच्या जोरावरती विधानसभा जिंकता येते तसेच इतर सत्ता बळकवता येतात. आज तोच मराठा समाजात विरोधात आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये सत्तेची बळकट स्थाने ही मराठा समाजाकडे आहे. ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली, तोच मुद्दा निकालामध्ये नमूद करण्यात आला. मराठा समाजातल्या जे बुद्धिमान सामंजस्य आणि आरक्षण कोणाला आणि कस मिळवू शकतो असा समजूतदार नेता मराठा समाजात नाही. जे काही नेतृत्व आहे, ते इकडून तिकडून गोळा केलेल्या पैशांच्या जोरावरती आणि काही समाजातल्या लाचारीचा फायदा घेत सत्तेवरती आले. आता असं म्हणावं लागेल एकेकाळी नेतृत्व प्रगल्भ होतं पण, आज ती प्रगल्भता आजच्या कुठल्याही नेत्यात सापडत नाही. जे काही नेतृत्व आहे, त्यातील तेलगीच्या स्टॅम्पमध्ये त्यांचं नाव आलं. काही स्वतःच्या स्वार्थासाठी वैयक्तिक हितसंबंधात गुंतले.

आणि कोविडच्या निमित्ताने आरक्षण क्षमताच नाही, हेच दिसते. अशा खुल्या नेतृत्वातून विरोध करून गरीब मराठा समाज आपली परिस्थिती बदलण्यासाठी, आरक्षणची अपेक्षा करतो. जे खंडीभर मराठा आरक्षणाची भाषणे करत होते, ते आज कुठे आहेत ? माहित नाही. त्यांनी नवाब मलिक सारख्या मुस्लीम नेत्याला पुढे करून सुप्रीम कोर्टावरती भाष्य करायला लावलं !  काय शोकांतिका !

एकाचीही हिम्मत नाही की, मराठा समाजाला तोंड देण्याची. जो तो आपापल्या बिळात जाऊन बसला. आरक्षण न मिळाल्याने लाखोंचे मोर्चे काढून मराठा समाजाने ताकद दाखविली. आशा फुलवल्या, तरुण पिढी आशावादी झाली. मुंबई हायकोर्टाने बाजूने निकाल दिला पण, सुप्रीम कोर्टाने त्याला रद्द केले. हा मराठा समाजावर एक मानसिक आघात आहे. या मानसिक आघाताला मराठा समाज कस तोंड देतो ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मोर्चाच्या माध्यमातून ओबीसीला दुखवले की, आम्हाला तुमच्या ताटात घ्या. त्यांनी पूर्णपणे त्यांना नाकारले. दुसर्‍या बाजूस ऍट्रॉसिटीचा कायदा रद्द करा ! यामुळे आदिवासी आणि शेड्युल्ड कास्ट हाही विरोधात गेला. 
कोर्टाने आरक्षण न दिल्यामुळे एक जो रुबाब होता त्यालाच धक्का बसला. काय नेमकं चुकलं? याचा शोध तरुण मराठा घेत आहेत. ही सगळ्यांत चांगली बाब आहे. त्या सर्व तरुण मित्रांना माझे आवाहन आहे की, आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. सुप्रीम कोर्टाने अट टाकलीय ज्यांना आरक्षण घ्यायचं आहे त्यांचा प्रकर्षाने वेगळा समूह असला पाहिजे आणि हा वेगळा समूह जसे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेमध्ये प्रतिनिधी नसणारा किंवा मोजके प्रतिनिधी असणारा, म्हणूनच वंचित बहुजन आघाडीने श्रीमंत मराठ्यांच्या कचाट्यात राहण्यापेक्षा स्वतःच स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. गरीब मराठा हे जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत कुठल्याही कोर्टासमोर, अधिकारी वर्गासमोर, गरीब मराठ्याची परिस्थिती उभी राहणार नाही, तर ती श्रीमंत मराठ्याचीच परिस्थिती उभी राहील.
जोपर्यंत सर्व व्यवस्थेसमोर श्रीमंत मराठ्याचीच परिस्थिती राहील तोपर्यंत गरीब मराठ्याला काहीच मिळणार नाही. एक नवीन चर्चा सुरु झाली ती म्हणजे आम्ही काय करायचं ? हा जो प्रश्न उपस्थित करतात त्यांनी इथल्या किती शैक्षणिक संस्था, सहकारी साखर कारखाने, जिल्हा परिषद, पंचायत समित्या विविध तत्सम संघटना यांच्यावर किती गरीब मराठ्यांना स्थान दिले आहे हे सांगावं ? त्याच उत्तर नाही असं आहे.
हा प्रश्न विचारण्याचा हेतू की, आता तर सत्ता मराठ्यांच्या हातात आहे. पण मी ह्याच गरीब मराठ्याला विचारतो की, ‘मान्य आहे की सत्ता श्रीमंत मराठ्यांच्या हातात आहे पण, ती गरीब मराठ्यांच्या हातामध्ये येण्याची शक्यता आहे का? तर माझं उत्तर नाही.’
सत्ता येणार नसेल तर गरीब मराठ्याने चिंता का करावी ? आणि म्हणून यासाठी वंचित बहुजन आघाडी असं म्हणतेय की, गरीब मराठ्याने स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करावे. ही मागणी किंवा हा सवाल त्यांना नवीन नाही.
सुप्रीम कोर्टाने अनेक निर्णयामध्ये असं म्हटलंय की, ज्यांना आरक्षण घ्यायचंय तो वेगळा दिसणारा समूह असला पाहिजे. तो मागास असला पाहिजे. त्यानंतरच त्याला आरक्षण देणे योग्य आहे की अयोग्य हे आम्ही तपासू .
जोपर्यंत गरीब मराठा श्रीमंत मराठ्यांच्या पोटात आहे तोपर्यंत त्याच्यात वेगळेपण दिसणारच नाही. आतापर्यंत गरीब मराठा जातीसाठी माती खात राहिला पण, दुर्दैव ज्या गररीब मराठयाने श्रीमंत मराठ्याला सत्तेत बसवलं त्याने गरीब मराठ्याकडे पाठ फिरवली.
नुसती पाठ फिरवली नाही, तर मराठा समाज मागास कसा राहील याच दृष्टीने पावले उचलली. देशातली कृषी बाजारपेठ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय शेतकर्‍यांसाठी आरक्षित ठेवली, आणि येणार्‍या शासनावरती निर्बंध घातले. बाहेरून काही आणायचे असेल, तर शासनच आणू शकते. एखादी व्यक्ती आणू शकत नाही. गॅट करारनामाच्या वेळेस या श्रीमंत मराठ्यांपैकी आणि त्याचबरोबर शरद पवार हे गॅट कराराच्या बाजूने होते की विरोधात होते ?
गॅट करार हा बंद बाजारपेठ, आरक्षित असलेली बाजारपेठ, जगातील शेती खुली करा असं मानणारे शरद पवार होते की नाही ?
भारतीय बाजारपेठ खुल्या झाल्यानंतर शेतकर्‍यांचं नुकसान झालं की नाही ? हा शेतकरी मराठा आहे की नाही ?
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या एका अहवालामध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये ९० टक्के शेतकरी मराठा समाजातील आहेत. जातीची सत्ता, आत्महत्या करणारा मराठा, आरक्षणाच्या निर्णया विरोधात गेला. सरकार कोणाचे ? तर मराठ्यांचे. ज्या सरकारमुळे गरीब जातीच्या मराठ्यालाच फायदा नाही तो हा विचार का करतो ? गरीब मराठ्याने तर जी सत्ता त्याला फायदेशीर आहे, तिलाच त्याने पुढे आणले पाहिजे. 
जर असे केले नाही, तर आरक्षण मागणारा मराठा यावर मानसिक आघात होताना दिसतो हे मराठा समाजासाठी योग्य नाही. आम्ही गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे याच मताचे आहोत. वंचित बहुजन आघाडीची सुरुवातीपासूनची अशीच भूमिका आहे.