Saturday, April 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शिवसेना मला बघून घेणार म्हणजे, माझा मर्डर करणार आहे का?’

मुंबई/दि/
छत्रपती घराण्याविरोधात बोलल्यास तुम्हाला बघून घेऊ, असे शिवसेनेच्या मुखपत्रातून सांगितले जाते. मला बघून घेणार, म्हणजे नक्की काय करणार? ते माझा खून करणार आहेत का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित केला.
ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ‘सामना’तून करण्यात आलेल्या टीकेवरुन सेनेवर पलटवार केला. मुळात ‘सामना’ या सगळ्या प्रकरणात का भूमिका घेत आहे, तेच मला समजत नाही. मला सामनाला एवढंच विचारायचं आहे की, तुम्ही बघून घेणार म्हणजे नेमकं काय करणार? मारणार, मर्डर करणार?, त्याचा खुलासा करुन टाका. तसे असेल तर कुठे यायचं ते सांगा, मी येतो, असे जाहीर आव्हान बाळासाहेब आंबेडकर यांनी शिवसेनेला दिले.


तसेच बाळासाहेब आंबेडकर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होण्याचे भाकीतही वर्तवले. सध्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरु आहे. केंद्र व राज्यात अराजकीय मुद्द्यांवरुन राजकारण सुरु असले तर त्यावरुन फारसा परिणाम होत नाही. सध्याच्या परिस्थितीत केंद्र सरकार आपातकालीन व्यवस्थापन कायद्यातर्ंगत आदेश काढत आहे.


केंद्र सरकारने नुकत्या मंजूर केलेले कृषी विधेयक राज्यात लागू करण्यास महाविकासआघाडी सरकारने विरोध दर्शविला आहे. ही एकप्रकारची बंडखोरी आहे. भारतीय घटनेने राज्याला अशाप्रकारे बंडखोरी करण्याचा अधिकार दिलेला नाही. केंद्र सरकारने एखादा कायदा मंजूर केल्यास राज्यांना त्याचे पालन करणे बंधनकारक असते. त्यामुळे राज्य सरकारने कृषी विधेयक लागू करण्यास नकार दिल्यास कलम ३५६ अंतर्गत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.